आशिर्वाद फाऊंडेशनतर्फे श्रीवर्धन तालुक्यात दुसऱ्या मोफत पोलिस व सैन्य भरतीपूर्व कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

आशिर्वाद फाऊंडेशनतर्फे श्रीवर्धन तालुक्यात दुसऱ्या मोफत पोलिस व सैन्य भरतीपूर्व कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

३१ मे २०२५ रोजी श्रीवर्धन तालुक्यातील युवकांसाठी आशिर्वाद फाऊंडेशनतर्फे दुसऱ्या मोफत पोलिस व सैन्य भरतीपूर्व कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. मागील कार्यशाळेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता, या कार्यक्रमाचे आयोजन पुन्हा करण्यात आले.

या कार्यशाळेत उमेदवारांना संपूर्ण भरती प्रक्रियेची माहिती देण्यात आली, तसेच शारीरिक चाचणीवर विशेष भर देत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रम श्री मोहनलाल सोनी विद्यालय, बोर्ली पंचतन येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख आयोजन आशिर्वाद फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. राजेश चव्हाण यांनी केले. यावेळी श्री. संदीप पाटील सर आणि श्री. लीलाधर खोत सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच निखिल रिळकर, मयूर कविलकर, उद्देश वाघजे, नितीन पवार, अमित पाटील आणि अनिकेत पिळणकर यांचेही विशेष सहकार्य मिळाले.

कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक श्री. अशोक बाबर (संचालक, श्री करिअर अकॅडमी, मुंबई) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भरती प्रक्रियेचे सर्व टप्पे समजावून सांगितले.

स्थानिक युवकांना संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न

स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी आशिर्वाद फाऊंडेशन सातत्याने असे उपक्रम राबवत आहे. दिघी पोर्टच्या औद्योगिक विकासामुळे निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधींचा लाभ स्थानिक युवकांना मिळावा, यासाठी या कार्यशाळेत त्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात आले.

कार्यशाळेचा उद्देश आणि सहभाग

कार्यशाळेचा उद्देश उमेदवारांना भरती प्रक्रियेबद्दल योग्य माहिती देऊन त्यांना आत्मविश्वास देणे हा होता.

आमचा उद्देश केवळ पोलिस आणि सैन्य भरतीपर्यंत मर्यादित न ठेवता, वनरक्षक भरती, रेल्वे भरती, तलाठी भरती अशा इतर स्पर्धा परीक्षांसाठीही उपक्रम राबवण्याचा आहे. या उपक्रमांसाठी आपल्याकडील पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य अनिवार्य आहे. त्यामुळे, आम्ही सर्वांना आवाहन करतो की आपल्या परिसरात असे इच्छुक उमेदवार असतील, तर त्यांना ही माहिती नक्की पोहोचवा.

अशा उपक्रमांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवायचा असेल, तर आपण सर्वांनी मिळून हे स्वप्न प्रत्यक्षात आणावे लागेल. आपल्या भागात काहीजण अशा स्पर्धा परीक्षांबद्दल नकारात्मक दृष्टिकोन ठेवतात, तो दूर करून, या परीक्षांचा प्रचार करणे आणि जास्तीत जास्त मुलांना यामध्ये सहभागी करणे आवश्यक आहे. असे केल्याने आपल्या भागातील तरुण शासकीय सेवांमध्ये सामील होण्यास सज्ज होतील.

कार्यक्रमाने उपस्थित उमेदवारांना भरती प्रक्रियेबाबत योग्य दिशा व प्रेरणा दिली.